27/03/2020
कृपया २ मिनीटे वेळ काढून हा मेसेज वाचा. थोडा मोठा आहे पण आपल्यापुढे असलेल्या कोरोनाच्या संकटापेक्षा मोठा नक्कीच नाही...
कृपा करुन आपल्या घरातच रहा, उगाच रस्त्यावर फिरू नका, अगदीच आवश्यक असल्याखेरीज अजिबात बाहेर पडू नका. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. हे लाॅकडाऊन आपल्याच फायद्यासाठी आहे जेणेकरून आपण सुरक्षित राहू, कोरोनाचा प्रसार टळेल आणि वैद्यकीय यंत्रणेवर अनावश्यक ताण येणार नाही. हा लढा अदृष्य कोरोनासुराशी आहे. त्यामुळे जरी डोळ्यांना दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व नाकारता येत नाहीये. त्यामुळे सर्वप्रथम समजून घ्या आणि कृपया सहकार्य करा.
आता सध्या आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. जर या व्हायरसने आपल्या समाजात शिरकाव केला तर त्यात आपल्या जवळच्या, ओळखीच्या, नातेसंबंधातील प्रिय व्यक्तींचे किंवा आपले स्वतःचे देखील यात नाहक नुकसान होणार आहे.
त्यामुळे सध्या काय कमाई होत नाहीये, घरी बसावं लागतयं, करमत नाहीये, कंटाळा येतोय, अमुक आणायला जायचयं, तमुक करायचं होतं, उगाच बाऊ करतायत, काही होत नाही,पोलीस उगाच फटकवतायत वगैरे वगैरे किती त्या तक्रारी ! तुम्हाला मिळत नाही तर काय झालं कोणालाच काहीच मिळत नाहीये. तर मग बिघडलय कुठे काय?
तसं बघायला गेलं तर हे संकट जागतिक, राष्ट्रीय, राज्य, शहर, गाव, गल्ली, कुटुंब अशा सर्व पातळ्यांवर आहे. त्यामुळे ते रोखण्यासाठी शासन हर एक प्रयत्न करत आहे. मग ते अगदी नवनवीन योजना, पैशांची तरतूद, हाॅस्पिटल्स, व्हेंटीलेटर्स, कर्फ्यू, लाॅकडाऊन जनजागृती आणि अजून बरचं काही असेल. डाॅक्टर्स, नर्सेस, वाॅर्डबाॅय, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलीस अथक प्रयत्न करत आहेत. आणि आपल्याला केवळ दोन वेळचं खाऊन घरात बसायचं आहे, ते पण टीव्ही फेसबुक व्हाॅट्सॅप करतं आणि नेमक तेच जमत नाहीये.
आताचा हा महिना असून नसल्यासारखा आहे. कमाई नाही व फारसा खर्च ही नाही. आरामच तर करायचा आहे. आता वेळ आपल्यासाठी थांबली आहे. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा सगळ अगदी कालच्या दिवसासारखं सुरू होईल. त्यामुळे विचार करा आता ज्यासाठी बाहेर पडायचंच आहे ते खरचं इतकं महत्त्वाचं आहे का?
कोरोना व्हायरसने संक्रमित माणसाला लक्षणे दिसायला २ ते १४ दिवस दिवस लागतात. पहिल्या व्हायरसेस पेक्षा हा व्हायरस कमालीच्या वेगाने पसरतो व शरिरात टिकावही तेवढ्याच ताकदीनिशी धरून ठेवत असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे जे संक्रमित आहेत त्यांवर उपचार सुरू आहेत किंवा संशयित आहेत त्यांना घरातच वेगळे राहण्यास सांगितलं आहे. जेणेकरून आधीचे बरे होतील व जे संशयित आहेत तेवढ्यांवर उपचार केले जातील. बाकी घरात राहिल्याने कोरोना संक्रमणापासून वाचतील जेणेकरून ही संक्रमणाची साखळी तुटेल व देश कोरोनामुक्त होईल.
पण लोकांचा अतिशहाणपणा किंवा मुजोरपणा किंवा आणखी काही म्हणा, पण १४ दिवस घरात बसायला सांगितल्यावर लोक रस्त्यावरून, ट्रेन मधून फिरतायत, लग्नाला जातायत, दैनंदिन काम, जाॅब तसेच पार्ट्या करतायत, विलीगीकरण कक्षातून पळून जातायत आणि कळत नकळत हजारो लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण करतायत. ते लक्षण जरी दाखवत नसले तरी त्याच्याकरवी संसर्गाचा धोका आहेच ना! वारंवार जागृती करूनही कोणाच्याच डोक्यात प्रकाश पडत नाहीये!
जर आता ही परिस्थिती नाही आवरता आली तर चीन, इटली, स्पेन, अमेरिकेपेक्षाही भयानक परिस्थिती इथे उद्भवेल. शिवाय आताचा २१ दिवसांचा असलेला लाॅकडाऊनही वाढेल, कदाचित अनिश्चित काळासाठी यात काही शंका नाही. कारण बाहेरील
देशात तीच परिस्थिती आहे. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा जर युद्धपातळीवर तयार आहे आणि आपल्याला फार काही त्यातलं कळत नाहीये तर त्यांच नुसतं ऐकायला काय बिघडतयं? की ‘आ बैल मार सिंग’ म्हणून वागायचयं? हे आत्मघातकी वागणं आपल्यासोबतच्या सर्वांना मृत्यूच्या खाईत लोटणारं आहे. याला जबाबदार केवळ आणि केवळ आपणच!
‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या प्रमाणे आपण आता वागायला हवे. ज्या चुकांचा गंभीर परिणाम आज ते लोक भोगत आहेत, नेमक्या त्याच चुका आपणही करू पाहत आहोत. सुदैवाने पोलीस व सरकारी यंत्रणा गांभीर्य जाणून घेऊन त्यावर वेळीच योग्य त्या उपाययोजना करत आहेत. त्यांना सहकार्य करण्याची हीच वेळ आहे. त्याने जर काही चांगल होणार आहे मग ते करायला वैताग तो कसला? आणि सगळं बिघडल्यावर पश्चात्ताप करून काय साध्य होणार आहे?
म्हणूनच वारंवार ही एकच विनंती आहे की घरातच रहा व इतरांनाही घराबाहेर पडण्यास परावृत्त करा. किंवा घराबाहेर पडण्यापूर्वी स्वतःलाच विचारा की, ज्यासाठी आपण बाहेर पडत आहोत ते अगदी आताच करणं आवश्यक आहे का? नंतर करून चालणार नाही का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे धीर धरा. कारण तुमच्या सहकार्यानेच या कोरोनावर मात करणं शक्य आहे. पुस्तक वाचा, टीव्ही मूव्हीज किंवा वेब सीरीज बघा, छंद जोपासा, मुलांसोबत वेळ घालवा, नाहीतर सोशल मिडीया आहेच की, वेळ घालवायला!
हा लेख आवडल्यास नक्की फाॅरवर्ड करा आणि या जनजागृतीच्या कार्यात आपले योगदान द्या....
लेखक: एक सुजाण भारतीय नागरिक
( या लेखकाचे नाव बदलण्याची आवश्यकता नाही )
काॅपी पेस्ट